!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: ज्योतिष विद्या / शास्त्राची मर्यादा ..!!

Pages

Monday, October 8, 2012

ज्योतिष विद्या / शास्त्राची मर्यादा ..!!



( लेखक : अनामिक )
ज्योतिष विद्या / शास्त्रास मर्यादा आहे.  ती म्हणजे काय घडेल हे जरी सांगता आले तरी त्याचा परिणाम काय असेल हे सांगता येत नाही.  ही मर्यादा सांगण्यासाठी एक उदाहरण देतो.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले.  प्रचंड अभ्यास व व्यासंग होता.  हे ज्योतिषी आल्याबरोबर त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला.  ४-५ दिवस असे चालू होते. नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागलेत हे गोंदवलेकर महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले. महाराज : बरे झाले तुम्ही आलात. एक पत्रिका तुम्हाला दाखवावयाची होती. पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो.

ज्योतिषी : महाराज तुमचे काही काम आहे हेच मला माहित नव्हते नाहीतर तुमचेच काम मी प्रथम केले असते.  द्या ती पत्रिका मला.  लागलीच बघून टाकतो.

(महाराजांनी गादीखालून एक पत्रिका काढून दिली. ज्योतिषाने ती पाहायला सुरवात केली.  जसजशी ती पत्रिका तो पाहात होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला.)

ज्योतिषी : फारच खराब पत्रिका आहे ही. याला अगदी लहानपणापासून त्रास आहे.
महाराज : हं.
ज्योतिषी : अन्नान्न दशा याच्या अगदी पाचवीलाच पूजली आहे.  कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल.
महाराज  : हं.
ज्योतिषी  : आई वडिलांचे सुखही नाही. 
महाराज  : हं.
ज्योतिषी  : फारच खडतर आयुष्य. लग्न होईल पण संसार सुख नाही. मुले होतील पण अल्पायुषी निपजतील. अरेरे द्विभार्या योग आहे. पण दुसर्‍या बायकोकडूनही संसार सुख नाहीच.
महाराज  :  हं.
ज्योतिषी  : असलेली इस्टेट पण जाईल याची.  चोर दरवडेखोर यापासून नक्की त्रास आहे.  एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही.  छे छे फारच खराब पत्रिका.  शेवटपर्यंत अन्नानदशा म्हणजे फारच झाले.  इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधिच पाहिली नव्हती.  कोणाची आहे हो?
महाराज  : माझी आहे ती. अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा. चांगलाच अभ्यास आहे तुमचा. माझ्या काही शंका आहेत त्या फेडायला तुमच्यासारखाच ज्योतिषी पाहिजे होता.

(खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली.  त्याला वाटले यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील.)

ज्योतिषी  : मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करेन.
महाराज  : राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा.
ज्योतिषि  : नाही तसे काही पत्रिकेवरून सागता येणार नाही
महाराज  : बर. असू दे.  मला हे सांगा कीया माणसाची अन्नान दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का?
ज्योतिषी  : नाही तसे काही सांगता येत नाही.
महाराज  : हो का. बर बर.  इस्टेट नाही या माणसाच्या नशिबातपण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील येवढे तरी दिसतेय का बघा ना पत्रिकेत.
ज्योतिषी  : नाही हो असे सांगता येणार.
महाराज  : आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते.  हे नामस्मरणाचे फळ आहे.  तुम्ही सर्व सांगितले. अगदी बरोबर सांगितले. काहीही चूक नाही त्यात. पण या सर्वांचा काय अपेक्षीत परिणाम होइल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहाता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे.
महाराजांकडून त्या ज्योतिषाने अनुग्रह घेतला हे वेगळे सांगायला नकोच.

(गोंदवलेकर महाराजांनी लहानपणीच घर सोडले.  त्यामुळे भिक्षा हेच अन्न मिळवण्याचा मार्ग होता.  पहिली बायको व दोन मुले निर्वतली.  दुसरी बायको आंधळी होती पण त्यांनीच ती स्वत:हून निवडली होती.  ती एक अधिकारी स्त्री होती.  आईचा जीव इस्टेटीत गुंतला आहे हे लक्षात आल्यावर ती सर्व लोकांकडून लुटवली.  कोर्टात एक केस होती.  ती जिंकल्यामुळे काही जमीन यांच्या नावावर झाली.  पण लागलीच एक बक्षीसपत्र करून ती जागा त्यांनी एका संस्थेला दान करून टाकली.  शेवटपर्यंत त्यांच्या नावावर काहीही नव्हते.)