मागील भागात आपण धर्मत्रिकोण बाबत जाणून घेतले.
या भागात आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार त्रिकोणांपैकी अर्थत्रिकोणबद्दल जाणून घेऊ या.
अर्थ : साधारणत: अर्थ म्हणजेच धन असे संबोधण्यात येते. शरीराचे पालन –
पोषण करण्यासाठी धनाची नितांत आवश्यकता असते. संसारात, भौतिक जगतात धनाचे असाधारण महत्व आहे. धर्माचा आधारच अर्थ म्हणजेच धन आहे
असे कौटिल्य यांनी म्हटले आहे. शुक्राचार्यांनुसार धर्म, काम,
मोक्ष इ. अर्थाच्या अधीन आहेत. हे जरी खरे असले तरी अर्थाची
व्याप्ती खुप मोठी आहे. चार आश्रमापैकी ब्रम्हचर्याचे पालन केल्यानंतर गृहस्थाश्रमाचे
पालन करण्यासाठी चतुर्विध पुरुषार्थापैकी अर्थ व कामास अत्यंत महत्व आहे कारण
संसारात पडलेला मनुष्य धन, शक्ती व वैभवाकडे झुकलेला असतो.
त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबाबरोबर समाजाची पण जबाबदरी असते. आपण
ज्या समाजात वावरतो, राहतो अशा समाजाच्या विकासासाठी,
समाजाचे ऋण फेडण्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य केले पाहिजे,
प्रत्येक व्यक्तीने त्याग भावनेने स्वत:चे पालन–पोषण करावे, असे आपली भारतीय संस्कृती सांगते.
अधर्माने मिळविलेल्या धनाने समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, ती
मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मनुष्य सतत सत्कर्म करीत असतो.
अर्थत्रिकोण : कुंडलीमधील व्दितीय, षष्ठम व दशम स्थान या तीन स्थानांचा
समूह.
व्दितीय स्थान : या स्थानास धनस्थान
म्हटले असून मनुष्याने कोणत्या माध्यमातून धनप्राप्ती करावी याचा बोध
होतो. धनाप्राप्ती साठी व्यवसाय अथवा नोकरी करणा-या व्यक्तीची वाणी मधुर असली
पाहिजे. आवाजात धार असली पाहिजे. आवाजातील गांभिर्य व जरब असली पाहिजे. काहि जण
गायन व इतर कलांच्या माध्यमातून अर्थार्जन करतात. या सर्वांचा बोध व्दितीय
स्थानावरुन होतो. हे स्थान कुटुंबस्थान म्हणून विचारात घेतले जाते. कुटुंबात पडणारी
भर / घट याचा अंदाज या स्थानावरुन घेता येतो, त्यामुळे
भविष्यात अर्थार्जनाची रुपरेषा ठरविता येते. या स्थानावरुन देशाच्या अर्थिक
स्थितीचे नियोजन करता येऊ शकते.
षष्ठम स्थान : या स्थानास शत्रुस्थान असे म्हटले असून सर्व प्रकारचे स्पर्धात्मक
यश , शत्रुवरील विजय इ. या स्थानावरुन बोध होतो.
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे मोठ्या कर्तबगारीने शत्रुवर विजय प्राप्त करुन
शत्रुचा खजिना लुटून आणत असत. अर्थार्जनासाठी कोणत्या प्रकारची नोकरी जास्त
उपयुक्त आहे याचा विचार देखील याच स्थानावरुन केला जातो तसेच कर्ज घेणे / देणे .
कर्जाची परतफेड इ. चा विचार या स्थानावरुन करतात.
दशम स्थान : या स्थानावरुन मनुष्याच्या उद्योगाबाबत व कर्तृत्वाबाबत ज्ञान
होते. समाजात रहावयाचे असेल तर सतत उद्योगशील असले पाहिजे. स्वकर्तृत्वाने समाजाचा
विश्वास संपादन केला पाहिजे तेव्हाच उत्तम अर्थप्राप्ती होते. कर्तबगारी शिवाय
शत्रुवर विजय कसा मिळणार ? शत्रुवर विजय नाही तर श्रीप्राप्ती तरी कशी होणार ?
उत्तम प्रकारचे कर्म केल्यास उत्तम प्रकारची गती प्राप्त होते. या
सर्व बाबींचा विचार दशमस्थानावरुन करतात.