!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: मला उमजलेले वास्तुशास्त्र .

Pages

Wednesday, October 10, 2012

मला उमजलेले वास्तुशास्त्र .

मला उमजलेले वास्तुशास्त्र .
मूळ "वस" या संस्कृत धातूपासून वसति, वस्तू, वास्तु अशी अर्थवाहक शब्दनिष्पत्ती प्रचलित झाली. खरेतर ऊन, पाऊस, वारा, अग्नि, हिंस्त्रश्वापदे व तसेच अन्य वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे, या सर्वांवर मात करण्यासाठी एखादे सुरक्षा कवच असावे म्हणून त्यावेळी मानवाने निसर्गाशी जवळीक साधून, निसर्ग नियमांशी, सृष्टीच्या रचनेशी बांधिलकी असलेले घर बांधून तो तेथे राहू लागला.अशा या नियमांशी,सृष्टीच्या रचनेशी बांधिलकी असलेली वास्तुनिर्मितीची प्रणाली म्हणजे "वास्तुशास्त्र" होय.  मुख्य दिशा, उपदिशा, पंचमहाभूते यांचे गुणधर्म व यामधील परस्पर संबंध हा वास्तुशास्त्राचा गाभा आहे.

वास्तुशास्त्र हे भारतीय दर्शन शास्त्राचे उपांग आहे. संगीत, योग, आयुर्वेद, ज्योतिष व वास्तुशास्त्र ही दर्शनशास्त्राची पाच उपांगे आहेत. खरे तर वास्तुशास्त्र हे आयुर्वेदासारखे आहे.  जसे आयुर्वेदात “ पंचकर्म, प्राणायाम व ध्यान इ. दिनचर्येचेच भाग बनविले तर आजारपण क्वचितच येईल “ म्हणजेच “प्रिव्हेंन्शन इज बेटर दॅन क्युअर”. वास्तुशास्त्राचा देखील हाच पाया आहे. वास्तुशास्त्राचा अति मह्त्वाचा गाभा कोणता असेल तर तो म्हणजे वास्तुज्योतिष (Astro Vastuआणि वास्तु शिल्पकार. (Vastu Planner.)

वास्तुज्योतिष  (Vastu Jyotish)
ज्योतिषशास्त्राधारे जातकाच्या जन्मकुंड्ली अथवा प्रश्नकुंड्लीमध्ये कोणत्याही प्रकारे "वास्तुदोष" आढळल्यास धार्मिक उपाय किंवा देव-देवतांच्या उपासनेने वास्तुदोषाचे निवारण करणे म्हणजेच "वास्तुज्योतिष"वास्तुदोष" याचा अर्थ आपण ज्या वास्तूत किंवा घरात राहतो त्या वास्तूचा किंवा घराचा दोष असा शब्दश: अर्थ न घेता आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या किंवा आपल्या पूर्वजन्मातील चुकांमुळे किंवा दुष्कृत्यांमुळे "वास्तुदोष" निर्माण होतो. तो जन्मकुंडली अथवा प्रश्नकुंडलीव्दारा प्रतिबिंबीत होतो. यालाच ज्योतिषशास्त्रात "वास्तुदोष" असे म्हणतात.

जन्म अथवा प्रश्न कुंडली मधील चतुर्थ स्थानावरून ’वास्तुयोग ’ व ’वास्तुसौख्य ’ यांचा विचार केला जातो. कुंडलीत काहि दोष अढळल्यास, ग्रहांची शांती करुन अथवा त्या संबंधीत देव-देवतांची उपासना करुन हा कुंडलीमधील दोष समूळ नष्ट करता येतो. तसेच या चतुर्थस्थानावरुन वास्तुच्या मुख्य प्रवेशव्दाराची दिशा ठरविता येते. प्रत्येकास दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार अशुभच असते असे नाही. 

नविन वास्तुचे बांधकाम करण्यापूर्वी ज्योतिषांनी सांगितलेल्या मुहूर्तावर बांधकाम करणे अत्यंत मह्त्वाचे असून या शुभ मुहूर्तामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरु झाल्यानंतर येणारी संकटे सुसह्य होतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर या नूतन वास्तूत राहण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर वास्तुशांती करणे अत्यंत मह्त्वाचे आहे.

हि नूतन वास्तु निर्मितीसाठी ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लाभला आहे उदा. कामगार, मालाचा पुरवठा करणारे इ. वास्तुशांतीच्या दिवशी खास निमंत्रित करुन त्यांचा आदर-सत्कार करणे हे नवग्रह शांती ऐवढेच अत्यंत महत्वाचे आहे. तसेच या नूतन वास्तुमध्ये सुख, शांती, स्थैर्य लाभावे म्हणून त्यांचे अशिर्वाद देखिल अत्यंत मह्त्वाचे आहेत.   

वास्तु शिल्पकार. (Vastu Planner)
विज्ञान, तंत्रज्ञान, पंचमहाभूते, सर्व दिशा, उपदिशा, ग्रह व संबंधीत देवता यांची सांगड घालून तयार केलेल्या वास्तुनकाशाचा निर्माता म्हणजेच         “वास्तु शिल्पकार(Vastu Planner)  अश्या वास्तुनिर्मितीमुळे मनाला समाधान व शांतता मिळते. 

उत्तम वास्तुनिर्मितीसाठी उत्तम जागा असणे महत्वाचे आहे. जागेचा आकार हा शक्यतो आयताकृती किंवा चौरस असावा कारण इतर आकाराच्या जागेत वास्तुचा नकाशा करताना खोल्यांचे आकारमान आयताकृती किंवा चौरस नसल्याने बरीच जागा वाया जाते, विस्कळीतपणा येतो त्यामुळे मन प्रसन्न राहणार नाही. काळी माती असलेल्या जागेपेक्षा मुरमाड असलेली जागा अतिशय उत्तम, कारण इमारतीच्या पायासाठी होणारा खर्च इतरमानाने कमी असतो. पाण्याचा साठा असलेल्या जागेत घर बांधू नये कारण त्या पासून धोका निर्माण होतो व आरोग्यास अपायकारक असते. 

देऊळ, मशिद, चर्च इ. अति रहदारीच्या ठिकाणी जागा घेऊन वास्तुनिर्मिती केल्यास हवा व आवाजाचे प्रदुषण यामुळे अनारोग्य व अशांतताच नशिबी येते. दशदिशांचे अधिपती, त्यांच्या देवता, त्यांना प्रिय असलेल्या दिशा व वास्तुपुरुष या सर्वांचा विचार करुन वास्तुनिर्मिती केल्यास वास्तुपुरुषाची या वास्तुवर अखंड कृपा राहते. 

हे वैज्ञानिक व तांत्रिक युग असून नियोजीत वास्तु मध्ये मुबलक खेळती हवा, उजेड,  इमारतीचा सांगाडा, रंगसंगती या साठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा समतोल साधला असता उत्तम वास्तुनिर्मिती होऊ शकते. नियोजीत वास्तु ज्या ठिकाणी बांधावयाची आहे त्या ठिकाणच्या नगर रचनेच्या नियमाप्रमाणे वास्तु बांधल्यास या नियोजीत वास्तुमध्ये मुबलक खेळती हवा व उजेड यामुळे आरोग्यास उपयुक्त अशी वास्तुनिर्मिती होते व त्यामुळे मनाला मानसिक समाधान व शांतता मिळते.  

No comments:

Post a Comment