विवाहमेलन आणि वैवाहिक
सौख्य.....
विवाह हा एक पवित्र
संस्कार हिंदू धर्माने मानला आहे. विवाहसंबंध केवळ विषय भोगाकरिता व लौकिक
व्यवहाराकरीता घडत नाही. तर धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष एकमेकांचा पती-पत्नी या
नात्याने केलेला अंगिकार, स्त्री व पुरुष या दोन हृदयाचे दृढ संमेलन म्हणजेच विवाह .
विवाह स्वर्गातच
निश्चित झालेले असतात ते आपण पृथ्वीवर साजरे करतो हे जरी खरे असले तरी परमेश्वराने
मनुष्यास सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुध्दि दिलेली आहे. अज्ञानाने
केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व
उन्नतीचे मूळ आहे म्हणून ज्योतिषशास्त्राधारे वधू-वराच्या पत्रिकेचे गुणमेलन ज्ञात
करुन वा तपासून विवाह केल्यास वधू-वराचा संसार सुखी होईल.
तुम्हाला जर
पंचांगावरुन गुणमेलन कसे पहावयाचे हे जरी कळत असले तरी वधू-वराचा विवाह ठरेल किंवा
नाही हे सांगण्याचे आवश्य टाळा. कदाचित अनुभवी ज्योतिषाएवढे त्या बद्दल ज्ञान नसल्याने
तुमच्या सल्ल्यामुळे अशा विवाहयोगात विवाह-विच्छेद, मतभिन्नता, मन:स्ताप, पश्चाताप
यापैकी काहीही घडू शकते. या पैकी आपल्या वाटणीस काही येऊ नये असे वाटत असेल तर
अनुभवी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. आपणच पंचांगावरुन गुणमेलन करु नका.
ज्योतिषीसुध्दा पंचांगावरुन
गुणमेलन करतो. पण त्याचबरोबर तो उभयतांच्या पत्रिकेमधील ग्रहमैत्री, येणारा भावी
काल यांचा विचार करतो. कारण विवाहानंतर सहा महिन्यात मृत्युयोग असलेल्या पत्रिकेत
अगदी ३६ गुण जमूनही काय उपयोग ? खरे तर पत्रिका पाहताना आयुष्य, आरोग्य, आर्थिक
सुस्थिती, भावीकाल, संतती व सुख इ. गोष्टी विचारात घेऊन उभयतांच्या पत्रिकेमधील
गुणमेलन करावे.
आयुष्य : वधू-वराच्या
पत्रिकेत दीर्घायुषी योग असावेत. वैवाहिक सौख्य काही काळच असलेली कुंडली कितीही
उत्तम असली तरी उपयोग काय ?
आरोग्य : माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच तो जीवनातील सर्व
गोष्टींचा आस्वाद निर्भेळपणे घेऊ शकतो. नवरा लखपती आहे पण वर्षातील सहा-सहा महिने
क्षयाच्या आरोग्यधामात राहणार असेल तर काय उपयोग? विवाहानंतर महारोगासारखे विकार
होणार असतील तर अशी पत्रिका त्याज्य ठरवावी हेच उत्तम.
आर्थिक सुस्थिती : मुलगा खुप देखणा आहे, प्रकृती उत्तम आहे. पण
त्याच्या उपजिविकेचे साधनच जर दुबळे असेल तर कोणत्या भरवशांवर मुलगी या ठिकाणी
देणार ? निदान आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची क्षमता त्या मुलाजवळ असायला हवी.
निदान मुलगी देताना तरी आर्थिक क्षमता चांगली असावी. पुढे तिच्या नशिबाचा भाग.
भावीकाल : पत्रिकेतील शुभसूचक कालखंडाचा सुगावा ज्योतिषांना
लागतोच अशावेळी त्यांनी सुचविलेले स्थळ जरुर निवडावे. कारण आजची ओढाताण म्हणजे
पहाटेपूर्वीचा काळोख असतो. लवकरच भाग्याचा सूर्य उगवणार असतो.
संतती : विवाहचा मुख्य उद्देशच प्रजोत्पादन असतो. वर व
वधू या दोघांच्या पत्रिकेत संततीसौख्य योग ह्वाच.
संतान नसेल तर आयुष्य निरस होते. उत्साह मावळतो. मनुष्य कितीही श्रमलेला, थकलेला
असो, समोर हसरी मुले पाहिल्यावर त्याचा श्रम परिहार होतो.
सुख : संसार कावळे-चिमण्याही करतात. परंतू असा संसार येथे
अभिप्रेत नाही. या संसारत दोघांचे स्वभावधर्म एकमेकांशी जुळते हवेत. नाहीतर वरील
पाच गोष्टींची अनुकुलता असून उपयोग काय ? यासाठी वैवाहिक जीवनात
समाधान हवे असेल तर पत्रिका गुणमेलन करताना वरील सहा मुद्दे विचारात घेऊनच गुणमेलन
करावे.
वरील सर्व मुद्दे समाधानकारक असतील तर, गुण १८
पेक्षा कमी असले तरी पत्रिका जमविण्यास हरकत नाही.
( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)
( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)
No comments:
Post a Comment