!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: Astrology / ज्योतिष

Pages

Showing posts with label Astrology / ज्योतिष. Show all posts
Showing posts with label Astrology / ज्योतिष. Show all posts

Monday, October 15, 2012

आकाशातील ग्रहनक्षत्रांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम.


आपल्यापैकी ब-याच जणांना “ रोजनिशी “ लिहिण्याची सवय असेल, तर ती अत्यंत चांगली सवय आहे. रोजनिशी म्हणजे आपले स्वत:चे प्रतिबिंब. स्वत:च्या वागणुकीचे मूल्यमापन व अभ्यास करण्याचे उत्तम साधन. पंचांगात इंग्रजी तारीख व तिथीचा उल्लेख केलेला असतो. “ रोजनिशी “ लिहिताना इंग्रजी तारखे- बरोबर मराठी तिथी लिहिण्यास विसरु नका.

तिथी आणि त्यापुढे स्वत:ची त्या दिवसाची मन:स्थिती, लहान-मोठया गोष्टीने येणारा क्रोध, क्रोध न येणे, सिनेमा पाहणे, खाण्या-पिण्याची इच्छा, तीव्र-मध्यम-मंद, कामवासना, प्रसन्नता, उदासिनता, मंदिरात जाणे, सत्संग वगैरे. दिवसभरात जे विशेष असेल ते लिहा. आणि वर्षभरानंतर ती “ रोजनिशी “ पुन्हा पाहा.

तिथीप्रमाणे व चंद्रराशीप्रमाणे वर्गीकरण करा. तुम्हाला अश्चर्य वाटेल की, एखाद्या तिथीला तुमची एखादी इच्छा तीव्र-मध्यम-मंद असेल तर एक वर्षानंतर त्याच तिथीला तुमची संबंधित इच्छा मागील वर्षाप्रमाणे जवळपास तशीच असते म्हणजेच साम्य असते. एक प्रकारची Cyclic Order  सापडेल.  अर्थात प्रत्येक व्यक्तीसाठी Cyclic Order  वेगवेगळी असेल. तिथी वेगळी असेल. उदा. एखाद्या व्यक्तीला पंचमीला क्रोध येईल तर दुस-यास अष्टमीस येईल. व्यक्ती-व्यक्तीत फरक पडेल. परंतु प्रत्येक व्यक्तीबाबतीत त्याचे पुनरावर्तन होत राहते. 

जर प्रत्येकानेच आपला स्वत:चाच असा तिथीनुसार अभ्यास करुन, स्वत:च्या शुभ-अशुभ तिथी शोधून काढल्या तर अधिक सुखप्राप्तीसाठी व दु:ख टाळण्यासाठी याचा खूपच उपयोग होईल. समजा ज्या दिवशी क्रोध येण्याची तिथी असेल त्या दिवशी चांगल्या, सात्विक लोकांच्या सान्निध्यात राहून क्रोध टाळता येईल. या व्यतिरीक्त असे असंख्य फायदे आहेत.

जन्मपत्रिकेमधील चंद्र,सूर्य व इतर ग्रहांचे स्थान, त्यांचे परस्परांमधील होणारे योग या नुसार त्या व्यक्तीवर तिथीचा  कमी अधिक प्रमाणात परिणाम होईल.

आता नुकतेच जागतिक खगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांनी ( महान खगोलशास्त्रज्ञ) स्वीकार केला आणि जाहिर केले की आकाशातील ग्रह नक्षत्रांचा मानवी जीवनावर निश्चितच शारिरिक व मानसिक परिणाम होतो.         

Saturday, October 13, 2012

विवाहमेलन आणि वैवाहिक सौख्य.....


विवाहमेलन आणि वैवाहिक सौख्य.....

 विवाह हा एक पवित्र संस्कार हिंदू धर्माने मानला आहे. विवाहसंबंध केवळ विषय भोगाकरिता व लौकिक व्यवहाराकरीता घडत नाही. तर धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार, स्त्री व पुरुष या दोन हृदयाचे दृढ संमेलन म्हणजेच विवाह .

विवाह स्वर्गातच निश्चित झालेले असतात ते आपण पृथ्वीवर साजरे करतो हे जरी खरे असले तरी परमेश्वराने मनुष्यास सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुध्दि दिलेली आहे. अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे म्हणून ज्योतिषशास्त्राधारे वधू-वराच्या पत्रिकेचे गुणमेलन ज्ञात करुन वा तपासून विवाह केल्यास वधू-वराचा संसार सुखी होईल.

तुम्हाला जर पंचांगावरुन गुणमेलन कसे पहावयाचे हे जरी कळत असले तरी वधू-वराचा विवाह ठरेल किंवा नाही हे सांगण्याचे आवश्य टाळा. कदाचित अनुभवी ज्योतिषाएवढे त्या बद्दल ज्ञान नसल्याने तुमच्या सल्ल्यामुळे अशा विवाहयोगात विवाह-विच्छेद, मतभिन्नता, मन:स्ताप, पश्चाताप यापैकी काहीही घडू शकते. या पैकी आपल्या वाटणीस काही येऊ नये असे वाटत असेल तर अनुभवी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. आपणच पंचांगावरुन गुणमेलन करु नका.

ज्योतिषीसुध्दा पंचांगावरुन गुणमेलन करतो. पण त्याचबरोबर तो उभयतांच्या पत्रिकेमधील ग्रहमैत्री, येणारा भावी काल यांचा विचार करतो. कारण विवाहानंतर सहा महिन्यात मृत्युयोग असलेल्या पत्रिकेत अगदी ३६ गुण जमूनही काय उपयोग ? खरे तर पत्रिका पाहताना आयुष्य, आरोग्य, आर्थिक सुस्थिती, भावीकाल, संतती व सुख इ. गोष्टी विचारात घेऊन उभयतांच्या पत्रिकेमधील गुणमेलन करावे.

आयुष्य : वधू-वराच्या पत्रिकेत दीर्घायुषी योग असावेत. वैवाहिक सौख्य काही काळच असलेली कुंडली कितीही उत्तम असली तरी उपयोग  काय ?

आरोग्य : माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच तो जीवनातील सर्व गोष्टींचा आस्वाद निर्भेळपणे घेऊ शकतो. नवरा लखपती आहे पण वर्षातील सहा-सहा महिने क्षयाच्या आरोग्यधामात राहणार असेल तर काय उपयोग? विवाहानंतर महारोगासारखे विकार होणार असतील तर अशी पत्रिका त्याज्य ठरवावी हेच उत्तम.  

आर्थिक सुस्थिती : मुलगा खुप देखणा आहे, प्रकृती उत्तम आहे. पण त्याच्या उपजिविकेचे साधनच जर दुबळे असेल तर कोणत्या भरवशांवर मुलगी या ठिकाणी देणार ? निदान आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची क्षमता त्या मुलाजवळ असायला हवी. निदान मुलगी देताना तरी आर्थिक क्षमता चांगली असावी. पुढे तिच्या नशिबाचा भाग.

भावीकाल : पत्रिकेतील शुभसूचक कालखंडाचा सुगावा ज्योतिषांना लागतोच अशावेळी त्यांनी सुचविलेले स्थळ जरुर निवडावे. कारण आजची ओढाताण म्हणजे पहाटेपूर्वीचा काळोख असतो. लवकरच भाग्याचा सूर्य उगवणार असतो.

संतती : विवाहचा मुख्य उद्देशच प्रजोत्पादन असतो. वर व वधू या दोघांच्या पत्रिकेत संततीसौख्य योग ह्वाच. संतान नसेल तर आयुष्य निरस होते. उत्साह मावळतो. मनुष्य कितीही श्रमलेला, थकलेला असो, समोर हसरी मुले पाहिल्यावर त्याचा श्रम परिहार होतो.

सुख : संसार कावळे-चिमण्याही करतात. परंतू असा संसार येथे अभिप्रेत नाही. या संसारत दोघांचे स्वभावधर्म एकमेकांशी जुळते हवेत. नाहीतर वरील पाच गोष्टींची अनुकुलता असून उपयोग काय ? यासाठी वैवाहिक जीवनात समाधान हवे असेल तर पत्रिका गुणमेलन करताना वरील सहा मुद्दे विचारात घेऊनच गुणमेलन करावे.

वरील सर्व मुद्दे समाधानकारक असतील तर, गुण १८ पेक्षा कमी असले तरी पत्रिका जमविण्यास हरकत नाही.

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)


Wednesday, October 10, 2012

॥ नवग्रह स्तोत्र ॥



॥ नवग्रह स्तोत्र  ॥

( कंसात ज्या ग्रहाचे स्तोत्र आहे त्या ग्रहाचे नाव दिले आहे. )

जपाकुसुम संकाशं  काश्यपेयं महद्युतिं ।
तमोरिसर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं ॥  (रवि)

दधिशंख तुषाराभं  क्षीरोदार्णव संभवं ।
नमामि शशिनं सोंमं  शंभोर्मुकुट भूषणं ॥  (चंद्र)

धरणीगर्भ संभूतं  विद्युत्कांतीं समप्रभं ।
कुमारं शक्तिहस्तंच  मंगलं प्रणमाम्यहं ॥  (मंगळ)

प्रियंगुकलिका शामं  रूपेणा प्रतिमं बुधं ।
सौम्यं सौम्य गुणपेतं  तं बुधं प्रणमाम्यहं ॥  (बुध)

देवानांच ऋषिणांच  गुरुंकांचन सन्निभं ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं  तं नमामि बृहस्पतिं ॥ (गुरु)

हिमकुंद मृणालाभं  दैत्यानां परमं गुरूं ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं  भार्गवं प्रणमाम्यहं ॥   (शुक्र)

नीलांजन समाभासं  रविपुत्रं यमाग्रजं ।
छायामार्तंड संभूतं  तं नमामि शनैश्वरं ॥  (शनि)

अर्धकायं महावीर्यं  चंद्रादित्य विमर्दनं ।
सिंहिका गर्भसंभूतं  तं राहूं प्रणमाम्यहं ॥  (राहू)

पलाशपुष्प संकाशं  तारका ग्रह मस्तकं ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं ॥  (केतु)

फलश्रुति :

इति व्यासमुखोदगीतं  य पठेत सुसमाहितं ।
दिवा वा यदि वा रात्रौ  विघ्नशांतिर्भविष्यति ॥
नर, नारी, नृपाणांच। भवेत् दु:स्वप्न नाशनं ॥
ऐश्वर्यंमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनं ॥
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा ।
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय: ॥

इति श्री व्यासविरचित ।
आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं ॥

Tuesday, October 9, 2012

ज्योतिषशास्त्र आणि संगीत.



सा रे ग म प ध नि या सात शुध्द स्वरांबरोबर पाच विकृत स्वारांचा समावेश संगीत विद्येत अत्यंत महत्वाचा आहे. हे सर्व स्वर मिळून बारा स्वर होत, याच प्रमाणे ज्योतिषशास्त्रात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन इ.बारा राशी आहेत. या पैकि सिंहराशीचा स्वामी रवि ग्रह हा असून कर्क राशीचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे. राहिलेल्या राशी दहा व त्यांचे स्वामी पाच म्हणजेच मेष व वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ ग्रह, वृषभ व तुळ राशींचा स्वामी शुक्र ग्रह, मिथुन व कन्या राशींचा स्वामी बुध ग्रह, धनु व मीन राशींचा स्वामी गुरु ग्रह, मकर व कुंभ राशींचा शनि ग्रह.

या सप्तस्वरांपैकी सा (षड्ज) व प (पंचम) हे दोन्ही स्वर कायम शुध्दच असतात. त्याचप्रमाणे सूर्यमालेचा मुलाधार व आत्मकारक ग्रह रवि व मनाचा कारक ग्रह चंद्र हे कायम मार्गी असतात ते कधीच वक्री नसतात. कधी कधी चंद्र अदृष्य स्वरुपात असतो त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतात काही रागात पंचम स्वर वर्ज्य असलेला अढळून येतो. सा (षड्ज) या स्वराचे अधिपत्य सिंह राशीचा रविग्रहाकडे असून प (पंचम) या स्वराचे अधिपत्य कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रहाकडे आहे. 

या नंतर रे (रिषभ) या स्वरावर बुध या ग्रहाचे अधिपत्य असून शुध्द रे (रिषभ) स्वराचा विचार मिथुन राशीसाठी व कोमल रे (रिषभ) स्वराचा विचार कन्या राशीसाठी करण्यात आलेला आहे.      ग (गंधार) या स्वरावर शुक्र या ग्रहाचे अधिपत्य असून शुध्द ग (गंधार) स्वराचा विचार तुळ राशीसाठी व कोमल ग (गंधार) स्वराचा विचार वृषभ राशीसाठी करण्यात आलेला आहे. म (मध्यम) या स्वरावर मंगळ या ग्रहाचे अधिपत्य असून शुध्द म (मध्यम) स्वराचा विचार मेष राशीसाठी व तीव्र म (मध्यम) स्वराचा विचार वृश्चिक राशीसाठी करण्यात आलेला आहे. ध (धैवत) या स्वरावर गुरु या ग्रहाचे अधिपत्य असून शुध्द ध (धैवत) स्वराचा विचार धनु राशीसाठी व कोमल ध (धैवत) स्वराचा विचार मीन राशीसाठी करण्यात आलेला आहे.  नि (निषाद) या स्वरावर शनि या ग्रहाचे अधिपत्य असून शुध्द नि (निषाद) स्वराचा विचार कुंभ राशीसाठी व कोमल नि (निषाद) स्वराचा विचार मकर राशीसाठी करण्यात आलेला आहे.

थोडक्यात : 

स्वर : सा (षड्ज) – शुध्द,  ग्रह : सूर्य, अधिपत्य : सिंह रास

स्वर : रे (रिषभ) – शुध्द,  ग्रह : बुध, अधिपत्य : मिथुन रास

स्वर : रे (रिषभ) – कोमल,  ग्रह : बुध, अधिपत्य : कन्या रास

स्वर : ग (गंधार) – शुध्द,  ग्रह : शुक्र, अधिपत्य : तुळ रास

स्वर : ग (गंधार) – कोमल,  ग्रह : शुक्र, अधिपत्य : वृषभ रास

स्वर : म (मध्यम) – शुध्द,  ग्रह : मंगळ, अधिपत्य : मेष रास

स्वर : म (मध्यम) – तीव्र,  ग्रह : मंगळ, अधिपत्य : वृश्चिक रास

स्वर : प (पंचम) – शुध्द,  ग्रह : चंद्र, अधिपत्य : कर्क रास

स्वर : ध (धैवत) – शुध्द,  ग्रह : गुरु, अधिपत्य : धनु रास

स्वर : ध (धैवत) – कोमल,  ग्रह : गुरु, अधिपत्य : मीन रास

स्वर : नि (निषाद) – शुध्द,  ग्रह : शनि, अधिपत्य : कुंभ रास

स्वर : नि (निषाद) – कोमल,  ग्रह : शनि, अधिपत्य : मकर रास

जन्मकुंडलीनुसार तुम्हाला कोणते ग्रह अनुकुल व प्रतिकूल आहेत, त्यानुसार कोणत्या स्वारांची कंपने स्वत:स अनुकुल आहेत याची माहिती जाणकार ज्योतिषाकडून करुन घ्या. त्यानुसार तुम्हास अनुकुल असलेले स्वर, संगीत ऐका त्यामुळे मनाला मानसिक शांतता व आनंद मिळेल. तुम्ही स्वत: गायक अथवा वादक असाल तर तुम्हास अनुकुल असलेले स्वर, संगीत सादर करा त्यामुळे निश्चितच अत्यंत प्रसन्न, मनाला आनंद देणारे वातावरण निर्माण होऊन ईश्वरी साक्षात्काराची अनुभुती प्रत्ययास येईल.  

Monday, October 8, 2012

ज्योतिष विद्या / शास्त्राची मर्यादा ..!!



( लेखक : अनामिक )
ज्योतिष विद्या / शास्त्रास मर्यादा आहे.  ती म्हणजे काय घडेल हे जरी सांगता आले तरी त्याचा परिणाम काय असेल हे सांगता येत नाही.  ही मर्यादा सांगण्यासाठी एक उदाहरण देतो.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले.  प्रचंड अभ्यास व व्यासंग होता.  हे ज्योतिषी आल्याबरोबर त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला.  ४-५ दिवस असे चालू होते. नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागलेत हे गोंदवलेकर महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले. महाराज : बरे झाले तुम्ही आलात. एक पत्रिका तुम्हाला दाखवावयाची होती. पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो.

ज्योतिषी : महाराज तुमचे काही काम आहे हेच मला माहित नव्हते नाहीतर तुमचेच काम मी प्रथम केले असते.  द्या ती पत्रिका मला.  लागलीच बघून टाकतो.

(महाराजांनी गादीखालून एक पत्रिका काढून दिली. ज्योतिषाने ती पाहायला सुरवात केली.  जसजशी ती पत्रिका तो पाहात होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला.)

ज्योतिषी : फारच खराब पत्रिका आहे ही. याला अगदी लहानपणापासून त्रास आहे.
महाराज : हं.
ज्योतिषी : अन्नान्न दशा याच्या अगदी पाचवीलाच पूजली आहे.  कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल.
महाराज  : हं.
ज्योतिषी  : आई वडिलांचे सुखही नाही. 
महाराज  : हं.
ज्योतिषी  : फारच खडतर आयुष्य. लग्न होईल पण संसार सुख नाही. मुले होतील पण अल्पायुषी निपजतील. अरेरे द्विभार्या योग आहे. पण दुसर्‍या बायकोकडूनही संसार सुख नाहीच.
महाराज  :  हं.
ज्योतिषी  : असलेली इस्टेट पण जाईल याची.  चोर दरवडेखोर यापासून नक्की त्रास आहे.  एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही.  छे छे फारच खराब पत्रिका.  शेवटपर्यंत अन्नानदशा म्हणजे फारच झाले.  इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधिच पाहिली नव्हती.  कोणाची आहे हो?
महाराज  : माझी आहे ती. अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा. चांगलाच अभ्यास आहे तुमचा. माझ्या काही शंका आहेत त्या फेडायला तुमच्यासारखाच ज्योतिषी पाहिजे होता.

(खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली.  त्याला वाटले यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील.)

ज्योतिषी  : मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करेन.
महाराज  : राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा.
ज्योतिषि  : नाही तसे काही पत्रिकेवरून सागता येणार नाही
महाराज  : बर. असू दे.  मला हे सांगा कीया माणसाची अन्नान दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का?
ज्योतिषी  : नाही तसे काही सांगता येत नाही.
महाराज  : हो का. बर बर.  इस्टेट नाही या माणसाच्या नशिबातपण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील येवढे तरी दिसतेय का बघा ना पत्रिकेत.
ज्योतिषी  : नाही हो असे सांगता येणार.
महाराज  : आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते.  हे नामस्मरणाचे फळ आहे.  तुम्ही सर्व सांगितले. अगदी बरोबर सांगितले. काहीही चूक नाही त्यात. पण या सर्वांचा काय अपेक्षीत परिणाम होइल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहाता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे.
महाराजांकडून त्या ज्योतिषाने अनुग्रह घेतला हे वेगळे सांगायला नकोच.

(गोंदवलेकर महाराजांनी लहानपणीच घर सोडले.  त्यामुळे भिक्षा हेच अन्न मिळवण्याचा मार्ग होता.  पहिली बायको व दोन मुले निर्वतली.  दुसरी बायको आंधळी होती पण त्यांनीच ती स्वत:हून निवडली होती.  ती एक अधिकारी स्त्री होती.  आईचा जीव इस्टेटीत गुंतला आहे हे लक्षात आल्यावर ती सर्व लोकांकडून लुटवली.  कोर्टात एक केस होती.  ती जिंकल्यामुळे काही जमीन यांच्या नावावर झाली.  पण लागलीच एक बक्षीसपत्र करून ती जागा त्यांनी एका संस्थेला दान करून टाकली.  शेवटपर्यंत त्यांच्या नावावर काहीही नव्हते.)

Wednesday, October 3, 2012

ज्योतिष ! शास्त्र, विद्या, कला आदिंचा अविष्कार : ४


 मागील भागात आपण अर्थत्रिकोण बाबत जाणून घेतले. या भागात आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार त्रिकोणांपैकी  कामत्रिकोण बद्दल जाणून घेऊ या. 

काम :  चतुर्विध पुरुषार्थापैकी तिसरा पुरुषार्थ म्हणजे काम. साधारणत: व्यवहारात काम म्हणजे वासना असेच मानले जाते. मनुष्यास आनंद व अंतर्गत संन्तुष्टी इच्छेमुळेच मिळते. तो अर्थार्जनासाठी धर्माचे पालन करीत स्वत:च्या इच्छा पूर्ण करीत असतो. परंतू तरुण अवस्थेत जेंव्हा त्याला यौन-संबंध किंवा संततीची इच्छा होते तेंव्हा ती पूर्ण करण्यासाठी मात्र त्यास भिन्नलिंग व्यक्ती बरोबर शारीरीक संबंध ठेवूनच ती इच्छा पूर्ण करावी लागते. वासनारुपी इच्छेमुळे आराजकता माजू नये, या वर अंकुश पाहिजेच म्हणूनच विवाह प्रथा आस्तित्वात आली. संयमीत कामापासून उत्तम संतती, परिवार. उत्तम परिवारापासून उत्तम समाज हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट आहे.

सात्विक, राजस व तामस इ. कामाचे/ कर्माचे तीन प्रकार असून सात्विक काम धर्मानुकुल आहे. शास्त्र सम्मत आहे. हे करत असताना शारीरिक सुख मिळत नाही परंतू हे परमेश्वराशी अनुसंधान साधणारे काम / कर्म असल्याने भविष्यात त्यापासून मानसिक आनंदच प्राप्त होतो. राजस काम वासनायुक्त आनंद देणारे असले तरी त्यापासून भविष्यात दुख: प्राप्त होते. तामस काम हे निद्रा व आळसाने युक्त असल्याने  ते टाळणे हेच मनुष्याच्या हिताचे आहे
. 

कामत्रिकोण : कुंडलीमधील तृतीयसप्तम  एकादश स्थान या तीन स्थानांचा समूह. 

तृतीय स्थान : पुरातन कालापासून विवाह जमविताना स्त्रीचे सौंदर्य व पुरुषाचे कर्तृत्व विचारात घेतले जाते. पूर्वीच्या राजे महाराजेंचे विवाह युध्द्भूमीवरील पराक्रम, पण जिंकून,  इ.कारणांमुळे झालेले आढळून येतात. तृतीय स्थानावरुन स्व:पराक्रम, कर्तृत्व, बुध्दीमत्ता याबद्दल माहिती मिळते. कोणताही विवाह ठरविताना मध्यस्थी व शेजारी अत्यंत महत्वाचे असतात याचा विचार याच स्थानावरुन केला जातो. प्रेम विवाहात संदेश वाहकाबद्दलची माहिती याच स्थानावरुन समजते. प्रेमपत्र, विवाह नोंदणी, कायदेशीर घटस्फोट इ. असंख्य बाबींची माहिती या स्थानावरुन मिळते. 

सप्तम स्थान :  या स्थानावरुन विवाह सौख्य पाहतात. विवाह संबंधी व त्या अनुषंगाने येणारे प्रश्नांची उत्तरे याच स्थानावरुन शोधता येतात. याच भावावरुन लैंगिक सौख्य व शरीरसुख उपभोगण्याची पध्दती समजते. विवाह स्थळे, विवाह मंडळे, विवाहाच्या पध्दती, प्रेम विवाह, विवाहामुळे झालेली फसगत इ. असंख्य विषयाचे ज्ञान या स्थानावरुन होते. 

एकादश स्थान : एकादश स्थान म्हणजेच लाभस्थान . मनुष्य जेंव्हा सात्विक, राजस व तामस इ. प्रकारे कर्म करीतो तेंव्हा त्याला इच्छापूर्तीदेखील महत्वाची असते. जवळ जवळ सर्व इच्छापूर्तीचा विचार लाभस्थानावरुन करतात. या स्थानवरुन मित्र-मैत्रिण व परिवार,संतती लाभ,  सर्व प्रकारचे लाभ, इच्छापूर्ती, हितचिंतक, मैत्री, पुनर्मिलन इ. बाबींचा विचार केला जातो. याच स्थानावरुन पती किंवा पत्नीचे आरोग्याबद्दल अंदाज बांधता येतात. कुंडलीतील सर्व भावांची / स्थानांची गोळाबेरीज म्हणजे लाभ स्थान आहे.

Tuesday, October 2, 2012

ज्योतिष ! शास्त्र, विद्या, कला आदिंचा अविष्कार : ३


 मागील भागात आपण धर्मत्रिकोण बाबत जाणून घेतले. या भागात आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार त्रिकोणांपैकी  अर्थत्रिकोणबद्दल जाणून घेऊ या.

अर्थ :  साधारणत: अर्थ म्हणजेच धन असे संबोधण्यात येते. शरीराचे पालन पोषण करण्यासाठी धनाची नितांत आवश्यकता असते. संसारात, भौतिक जगतात धनाचे असाधारण महत्व आहे. धर्माचा आधारच अर्थ म्हणजेच धन आहे असे कौटिल्य यांनी म्हटले आहे. शुक्राचार्यांनुसार धर्म, काम, मोक्ष इ. अर्थाच्या अधीन आहेत. हे जरी खरे असले तरी अर्थाची व्याप्ती खुप मोठी आहे. चार आश्रमापैकी ब्रम्हचर्याचे पालन केल्यानंतर गृहस्थाश्रमाचे पालन करण्यासाठी चतुर्विध पुरुषार्थापैकी अर्थ व कामास अत्यंत महत्व आहे कारण संसारात पडलेला मनुष्य धन, शक्ती व वैभवाकडे झुकलेला असतो. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबाबरोबर समाजाची पण जबाबदरी असते. आपण ज्या समाजात वावरतो, राहतो अशा समाजाच्या विकासासाठी, समाजाचे ऋण फेडण्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य केले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने त्याग भावनेने स्वत:चे पालनपोषण करावे, असे आपली भारतीय संस्कृती सांगते. अधर्माने मिळविलेल्या धनाने समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, ती मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मनुष्य सतत सत्कर्म करीत असतो.

 अर्थत्रिकोण : कुंडलीमधील व्दितीय, षष्ठम  दशम स्थान या तीन स्थानांचा समूह.



व्दितीय स्थान : या स्थानास धनस्थान म्हटले असून  मनुष्याने कोणत्या माध्यमातून  धनप्राप्ती करावी याचा बोध होतो. धनाप्राप्ती साठी व्यवसाय अथवा नोकरी करणा-या व्यक्तीची वाणी मधुर असली पाहिजे. आवाजात धार असली पाहिजे. आवाजातील गांभिर्य व जरब असली पाहिजे. काहि जण गायन व इतर कलांच्या माध्यमातून अर्थार्जन करतात. या सर्वांचा बोध व्दितीय स्थानावरुन होतो. हे स्थान कुटुंबस्थान म्हणून विचारात घेतले जाते. कुटुंबात पडणारी भर / घट याचा अंदाज या स्थानावरुन घेता येतो, त्यामुळे भविष्यात अर्थार्जनाची रुपरेषा ठरविता येते. या स्थानावरुन देशाच्या अर्थिक स्थितीचे नियोजन करता येऊ शकते.


षष्ठम स्थान : या स्थानास शत्रुस्थान असे म्हटले असून सर्व प्रकारचे स्पर्धात्मक यश , शत्रुवरील विजय इ. या स्थानावरुन बोध होतो. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे मोठ्या कर्तबगारीने शत्रुवर विजय प्राप्त करुन  शत्रुचा खजिना लुटून आणत असत. अर्थार्जनासाठी कोणत्या प्रकारची नोकरी जास्त उपयुक्त आहे याचा विचार देखील याच स्थानावरुन केला जातो तसेच कर्ज घेणे / देणे . कर्जाची परतफेड इ. चा विचार या स्थानावरुन करतात.
 

दशम स्थान : या स्थानावरुन मनुष्याच्या उद्योगाबाबत व कर्तृत्वाबाबत ज्ञान होते. समाजात रहावयाचे असेल तर सतत उद्योगशील असले पाहिजे. स्वकर्तृत्वाने समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे तेव्हाच उत्तम अर्थप्राप्ती होते. कर्तबगारी शिवाय शत्रुवर विजय कसा मिळणार ? शत्रुवर विजय नाही तर श्रीप्राप्ती तरी कशी होणार ? उत्तम प्रकारचे कर्म केल्यास उत्तम प्रकारची गती प्राप्त होते. या सर्व बाबींचा विचार दशमस्थानावरुन करतात.


Monday, October 1, 2012

ज्योतिष ! शास्त्र, विद्या, कला आदिंचा अविष्कार : २


 ( मागील भागात आपण शास्त्र , ज्योतिष श्रृती स्मृती इ. बद्दल जाणून घेतले आहे. या भागात आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार त्रिकोणांपैकी  धर्मत्रिकोण बद्दल जाणून घेऊ या. )


धर्म धर्म शब्द संस्कृत मधील ‘धृ’ धातु पासून बनला असून त्याचा अर्थ धारण करणे असा होतो. कर्म  कर्तव्य हि धर्माची प्रमुख लक्षणे होत.


धर्माची शिकवण : ज्या समाजात एकता आहे तेथे सुख, शान्ति, समृध्दि लाभते परंतू व्यक्तीगत स्वार्थामुळे कलह, संघर्ष, तृष्णा व दुख: अनुभवास येते. योग्य व अयोग्य यामधील फरक जाणून घेणे. योग्य व अयोग्य या गोष्टी देश, काल व परिस्थितीवर अवलंबून असतात. हे शरीर नश्वर असून, मृत्यु अटळ आहे. धन अथवा कोणत्याही प्रकारचे वैभव शाश्वत नाहि. धर्मसम्मत मार्गाने वाटचाल केल्यास अर्थपूर्ण जीवन,सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. परमेश्वर प्राप्ती, धर्म पालन करणा-याचे मूळ लक्ष असले पाहिजे.
 
धर्मत्रिकोण : कुंडलीमधील प्रथम, पंचम  नवम स्थान या तीन स्थानांचा समूह.


प्रथम स्थान :  मी, स्वत: कोण ? या बद्दल माहिती मिळते. स्वत:मधील चांगल्या-वाईट गुणांची, प्रकृतीची पारख करुन त्यामधील चांगल्या गुणांचा साह्याने आपल्या समाजासाठी, राष्ट्रासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणे हाच खरा धर्म असून, धर्माचे पालन करण्यासाठी योग्य दिशा समजते.


पंचम स्थान :  प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून प्रारब्ध व  संचितानुसार काहि ना काहितरी ज्ञान / विद्या संपादन करीत असतेच. पंचम स्थान हे  ज्ञान / विद्येचे स्थान असून, ज्ञान / विद्ये शिवाय जन्म व्यर्थ आहे. पंचम स्थान हे कलेचे स्थान असून आपल्या अंगी असलेल्या कला-गुणांचा विचार करुन त्या योगे लोकरंजनामधून समाज प्रबोधन करण्यासाठी योग्य दिशा समजते. एका आत्म्यापासून दुस-या आत्म्याची निर्मिती म्हणजेच संतती. प्रपंचातील प्रत्येक व्यक्तीने वंश वाढविण्यासाठी उत्तम, गुणी संतती निर्माण करणे हा एक धर्मच आहे ! अशा संततीचा विचार या स्थानावरुन केला जातो. परमेश्वर प्राप्ती, धर्म पालन करणा-याचे मूळ लक्ष असून त्यासाठी जी कठोर ईश्वर साधना घडते, साधना मार्गातील बैठक याच स्थानावरुन पाहिली जाते.


नवम स्थान :  पंचम स्थान हे जरी कला, विद्या, ज्ञानाचे स्थान असले तरी ते मिळविण्यासाठी व परमेश्वर प्राप्तीसाठी उत्तम  गुरु लाभणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. निसर्ग कुंडलीत नवम स्थानी धनु रास येते. या राशीचा स्वामीगुरु ग्रह असून तो मार्गदर्शन, देवता, धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे, दैविशक्ती, न्याय इ. निर्देशन करतो. या स्थानाला वैदिक ज्योतिषामध्ये  भाग्य स्थान म्हट्ले आहे. ज्याचे भाग्यस्थान उत्तम तो उत्तम प्रकारे धर्मशास्त्र जाणणारा असतो. नवम स्थानावरुन फार दुरच्या, परदेश प्रवासाचे ज्ञान होते. परमेश्वरापर्यंत पोहचायचे म्हटले तर प्रवास फार दूरचाच, या प्रवासासाठी  मार्गदर्शन करणारा उत्तम गुरु हवाच. गुरु, गुरुमंत्र, उपासना इ. बाबींचा विचार या स्थानावरुन केला जातो.